Thursday, January 29, 2009

सलाम...‘पद्मश्री’ नाकारणा-या साईनाथांना!

सलाम...‘पद्मश्री’ नाकारणा-या साईनाथांना!
28 Jan 2009, 1932 hrs IST

हारिस शेख



राजधानी नवी दिल्लीत ल्युटेन्स एरियात दोन मराठी माणसं भेटली आणि त्यांच्या पोटात भुकेचे कावळे ओरडू लागले तर साधारणपणे ते कोपर्निकस मार्गाला लागतात . इथल्या महाराष्ट्र सदनाच्या कॅंटिनमध्ये जेवणासोबत गप्पा असा दुहेरी उद्देश साध्य होतो . डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इथं गप्पा मारताना मित्राने शेजारच्या टेबलापाशी बसलेल्या एका सदगृहस्थाचा परिचय करून दिला . ‘ हे डॉ . अमूक तमूक , मुंबईत गोरेगावात यांचं मोठं हॉस्पिटल आहे . सदनात माझ्या खोलीत थांबलेत .’

डॉक्टर आहेत म्हटल्यावर दिल्लीत एखाद्या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी आले असावेत असा विचार मनात येवून गेला . पण ते तसं नव्हतच . मित्राने नंतर हळूच कानात सांगितलं , या सद्गगृहस्थाला यावर्षी पद्मश्री मिळवायची आहे . त्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केलंय त्यांनी . भेटीगाठी घेण्यासाठी गेला आठवडाभर दिल्लीत ठाण मांडून आहेत .’ आणि माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला .

दुसरी एक घटना . जानेवारीचा पहिला आठवडा . दिल्लीत थंडी ऐन भरात . मुंबई हल्ल्यानंतर मुजोर पाक राज्यकर्त्यांना रोजची सडेतोड उत्तरं देऊन बेजार झालेले ७३ वर्षीय परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी आपल्या १३ , तालकटोरा रोडवरच्या बंगल्यात मतदारसंघातून आलेल्यांच्या भेटी घेत होते . तेवढ्यात एक व्यक्ती बंगालीत बोलत पुढे आला . आणि माझं एक बंगाली गाणं ऐकाच , अशी प्रणवदांना गळ घातली . बिच्चारे प्रणवदा ! भाषेच्या प्रेमापोटी त्यांनी त्याला होकार दिला आणि जबरदस्तीचे ते सूर कानात कोंबून घेतले . त्यानंतर लगेच या गायकानं आपली मागणी पुढे रेटली . या गायकाची मेहनत अखेर फळाला आली . आणि हे गृहस्थ झाले पद्मश्री कुमार शानू !

जेष्ठ पत्रकार पी . साईनाथ यांनी पद्मश्री सन्मान घेण्याचे नाकारल्याचे वृत्त प्रकाशित झाले आणि एक विचार मनात आला . ‘ पद्मश्री ने सन्मानित करून केंद्र सरकार खरोखरच ' पत्रकार ' पी . साईनाथ यांचा गौरव करू इच्छित होते का ? की सरकारी अनास्थेमुळं गेल्या दशकभरात लाखो शेतक - यांच्या आत्महत्येमुळं गेलेली लाज राखण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग होता ?

दुष्काळ आणि सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्येला कवटाळणा - या विदर्भच नव्हे तर आंध्र प्रदेश , तामिळनाडू आणि केरळमधल्या लाखो शेतक - यांची व्यथा साईनाथ यांनी तळमळीने मांडली आहे . नव्वदच्या दशकात साईनाथ देशातल्या सर्वात दुष्काळग्रस्त जिल्ह्यात राहून वार्तांकन करायचे तेव्हा अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लेखणीचा धसका घेतला होता .

आपल्या लेखणीनं पत्रकारितेची शान उंचावणारे साईनाथ यांनी वेळोवेळी सरकारी यंत्रणेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचेच काम केले आहे . त्यामुळे आणि साहजिकच , आपल्या या कृत्यां मुळे साईनाथ सरकारी यंत्रणेच्या नजरेत एक झेंगाट झाले . हे झेंगाट दूर सारण्यासाठी यंत्रणेनं आपापल्या परीने वेगवेगळे प्रयोग सुद्धा केलेत . सर्वात मोठा कळस केला तो माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी . विदर्भातल्या शेतक-यांच्या आत्महत्येबाबत साईनाथ यांनी जगासमोर मांडलेलं विदारक सत्य खोडण्यासाठी त्यांनी चक्क एक सदस्यीय आयोगच नेमला . मात्र सरकारचा तो डावही उलटला .

सरकार नावाच्या निर्ढावलेल्या यंत्रणेच्या अंगावर सतत खेकसणा - या साईनाथसारख्या पत्रकाराचा शासकीय पातळीवर गौरव होणं तसं दुरापास्तच होतं . म्हणूनच गेले दोन दशकांपेक्षा जास्त काळ साईनाथ यांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव जगभर होत असताना राज्य आणि देशपातळीवर मात्र घोर उपेक्षा होत होती .

पी . साईनाथ यांना त्यांच्या २६ वर्षाच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत ३० राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत . त्यात रमन मॅगसेसे पुरस्कार ’, संयुक्त राष्ट्र संघाचा बिर्मा पत्रकारिता पुरस्कार ’, मानवाधिकार पत्रकारितेसाठीचा अॅम्नेस्टी पुरस्कार ’, बी . डी गोयंका पुरस्काराचा समावेश आहे .

दिल्लीत सत्तेच्या दरबाराच्या आसपास घुसमटणारे , ‘ बिग फाइट आणि वुई पिपल मधून दवंडी पिटणा - या पत्रकारांना पद्मश्री ने गौरवणा - या सरकारी यंत्रणेचं लक्ष साईनाथ यांच्याकडे जाऊच शकणार नाही , हे स्पष्ट होतं .

अशी ही यंत्रणा साईनाथ यांना मॅगेसेसे पुरस्कार मिळाल्यानंतर पद्मश्री साठी राजी झाली हेही नसावे थोडके. पण पुरस्कार स्वीकारायचे किंवा नाकारायचे हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं . कोणताही सरकारी पुरस्कार स्वीकारायचा नाही असं स्वतःवर बंधन घातल्यामुळं साईनाथ यांनी पद्मश्री नाकारली असं सांगण्यात येतं .

तरीही प्रश्न उरतोच . पद्मश्री देऊन सरकार खरंच त्यांचा सन्मान करू इच्छित होती का ?

ता . क. - यापूर्वी पद्म पुरस्कारांना नो, थँक्स म्हणणारे पी . साईनाथ यांचे भाऊबंद

) . एन सिवरामन , संपादक , तमिळ दैनिक दिनमनी ( पद्मश्री १९६५ )- ‘ पत्रकारांनी अशाप्रकारचे पुरस्कार स्वीकारणं योग्य नाही .’

) कनक सेन देका , संपादक , असामी दैनिक अग्रदूत ( पद्मश्री , २००५ )- ‘ हा पुरस्कार स्वीकारल्यानं आसामी नागरिकांनी माझ्यावर दाखवलेलं प्रेम आणि जिव्हाळयाचा अनादर होईल .’

) निखिल चक्रवर्ती , जेष्ठ पत्रकार , ( पद्मभूषण , १९९० ) - ‘ शासकीय पुरस्कार स्वीकारल्यानं निष्पक्ष पत्रकार म्हणून असलेली ओळख पुसली जाऊन व्यवस्थेसोबत जोडली जाईल .’

) खुशवंत सिंग , जेष्ठ पत्रकार , लेखक , ( पद्मभूषण , १९८४ )- ऑपरेशन ब्ल्यू स्टार कारवाईचा निषेध म्हणून सरकारला पुरस्कार परत .

No comments: