Tuesday, August 3, 2010

भूविकास बँकेच्या कर्जवसुलीसाठी-गावामध्ये होणार दवंडी-लोकमत

कर्जवसुलीसाठी गांधीगिरी करा - गावामध्ये होणार दवंडी-लोकमत
(04-08-2010 : 1:05:49)

रूपेश उत्तरवार
यवतमाळ, दि. ३ - थकीत कर्जामुळे डबघाईस आलेल्या भूविकास बँकेच्या कर्जवसुलीसाठी शिखर बँकेने 'गांधीगिरी' सारखे विविध उपाय योजण्याचे अफलातून निर्देश दिले आहेत. यामध्ये थकबाकीदार शतकऱ्यांच्या घरापुढे कर्मचाऱ्यांनी कर्जवसुलीसाठी खडापहारा द्यायचा आहे. याचवेळी कर्जवसुलीसाठी त्यांच्याच घरापुढे घोषणा देण्याचे निर्देश प्रशासक सुभाष माने यांनी दिले आहेत. त्यांच्या या अफलातून निर्णयाने थकबाकीदार शेतकऱ्यांना प्रचंड नामुष्की सहन करावी लागणार आहे.
एकेकाळी शतकऱ्यांसाठी तारणहार ठरलेली भूविकास बँक विघटनामुळे पार बुडाली. मोठ्या प्रमाणात शतकऱ्यांना कर्ज मिळवून देणारी ही बँक आता शेवटच्या घटका मोजत आहे. याचवेळी शिखर बँकेने शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे काही निर्णय घेतले. त्याच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. कर्जवसुलीसाठी मुंबई शिखर बँकेने राज्याच्या भूविकास बँकांना अफलातून निर्देश दिले आहेत. प्रत्येक जिल्हा बँकेने १०० मोठ्या थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी तयार करायची. त्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील १० शेतकरी घेण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार ३ हजार ३०० शेतकऱ्यांकडून ही कर्जाची वसुली होणार आहे. कर्जाचा भरणा न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गावामध्ये कर्जवसुलीसाठी प्रथम दवंडी दिली जाणार आहे. याचवेळी थकबाकीदार शेतकऱ्यांच्या घरापुढे ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा करायची आहे. या ठिय्या आंदोलनासाठी जिल्हा बँकेने सात ते आठ कर्मचाऱ्यांचा एक गट करायचा आहे. आवश्यकतेनुसार दुसरे गट तयार करण्याच्या सूचना आहेत. या आंदोलनाची सूचना सभासद, तहसीलदार आणि पोलिसांना देण्याचे निर्देश दिले आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या घरापुढे कर्ज वसुलीच्या घोषणा द्यायच्या आहेत. त्या घोषणा कोणत्या असतील याचा या आदेशात उल्लेख आहे. 'शेतकऱ्यांची बँक बुडवू नका', 'बँकेची वसुली तत्काळ भरा' यासारख्या अनेक घोषणांचा या परिपत्रकात उल्लेख आहे. जिल्हा बँकेने महिन्यात दहा दिवस हे आंदोलन शेतकऱ्यांच्या घरापुढे करण्याच्या लेखी सूचना प्रशासक सुभाष माने यांनी दिल्या आहेत. त्यांच्या या वादग्रस्त निर्णयाने थकबाकीदार शेतकऱ्यांना गावामध्ये प्रचंड नामुष्की सहन करावी लागणार आहे.
१७ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन
विदर्भ आणि कोकणातील कर्मचाऱ्यांचे वेतन थांबले आहे। सहा महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. २३ दिवसांपासून उपोषण असतानाही कुठलाही तोडगा निघाला नाही. यामुळे विदर्भ भूविकास बँक कर्मचारी कृती समितीने १७ ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
===============================================

No comments: