Thursday, May 2, 2013

राज्य सरकारच्या विरोधात विदर्भातील शेतकरी विधवांचा उपोषण सत्याग्रह-loksatta



नागपूर/विदर्भ वृत्तान्त

राज्य सरकारच्या विरोधात विदर्भातील शेतकरी विधवांचा उपोषण सत्याग्रह

  नागपूर- Published: Thursday, May 2, 2013

 http://www.loksatta.com/vruthanta-news/farmers-widow-in-vidharbha-kept-fasting-agitation-against-state-government-107148/

शेतक ऱ्यांचे प्राण वाचविण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करून महाराष्ट्र दिनी विदर्भातील शेकडो विधवांनी उपोषण सत्याग्रह केला. राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे विदर्भात दहा हजारांवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. शेतकरी व आदिवासींचे अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी आता केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या गुलामगिरीतून विदर्भाला मुक्त करून वेगळे राज्य निर्माण करावे, असा एकमुखी ठराव या महिलांनी बुधवारी आयोजित सत्याग्रहात पारित
केला.
यवतमाळ जिल्ह्य़ातील पांढरकवडा येथे झालेल्या उपोषण सत्याग्रहाला शेतकरी नेते किशोर तिवारी, मोहन जाधव, सुरेश बोलेणवार, मनोज मेश्राम, मोरेश्वर वातिले, संतोष नैताम आदी प्रामख्याने सहभागी झाले. सरकारच्या उदासीन धोरणाचा निषेध करण्यासाठी शेकडो शेतकरी विधवांनी हा उपोषण सत्याग्रह केला असून महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून सरकारचा निषेध करीत आहेत, असे किशोर तिवारी म्हणाले. सत्याग्रहात बेबी बैस, सरस्वती अंबरवार, रेखा गुरनुले, चंद्रकला मेश्राम, सुरेखा चव्हाण, पार्वता कुडमेथे, वंदना मोहुर्ले, अपर्णा मालीकर, वंदना गावंडे यांच्यासह शेकडो शेतकरी विधवा सहभागी झाल्या. राज्य सरकारने विदर्भाच्या आदिवासींच्या विकासासाठीचा प्रत्येक वर्षी ४ हजार कोटीच्यावरचा निधी पश्चिम महाराष्ट्रासाठी व कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वापरला आहे. त्यामुळे राज्याच्या निर्मितीच्या ५० वर्षांनंतरही आदिवासी कुपोषण व भूकबळीला तोंड देत आहे. आदिवासींवर होत असलेल्या अन्याय व उपेक्षाच्या विरोधात काळा दिवस करत आहोत, असे आदिवासी नेते तुकाराम मेश्राम म्हणाले.

No comments: